Sunday, July 12, 2009

मधुमेह आणि लठ्ठपणा

मधुमेह आणि लठ्ठपणा
Wednesday, March 04th, 2009 AT 11:03 AM


काही वर्षांपूर्वीपर्यंत मधुमेह हा फक्त श्रीमंतांचा आजार आहे, असे मानले जात होते. पण आज मध्यमवर्गीय व गरिबांमध्येसुद्धा मधुमेहाचे प्रमाण वाढताना दिसत आहे.
वाढणाऱ्या प्रत्येक एक किलोग्रॅम वजनामुळे मधुमेहाची जोखीम पाच टक्‍क्‍यांनी वाढते. मधुमेहामध्ये एक तर इन्सुलिनचे उत्पादन होत नाही. उदा. प्रकार 1 चा मधुमेह अथवा त्याची कमतरता तरी दिसते. ही कमतरता खरी अथवा साक्षेपी उदा. 2 चा मधुमेह असते. जगभर प्रकार 2 च्या मधुमेहींचे प्रमाण इतर प्रकारच्या मधुमेहींपेक्षा जास्त आहे. भारतातील मधुमेही रुग्णांपैकी 95 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त मधुमेही रुग्ण या प्रकारात मोडतात.
लठ्ठपणाचा संबंध इन्सुलिनविषयीची अल्पसंवेदनशीलता अथवा इन्सुलिन विरोध यांच्याशी असतो. परंतु सर्वच लठ्ठ व्यक्तींना मधुमेह होतो असे नाही. कारण बऱ्याच लठ्ठ व्यक्ती स्वादुपिंडात जास्त इन्सुलिन तयार करून इन्सुलिन विरोधावर मात करतात; परंतु ज्या लठ्ठ व्यक्तींमध्ये इन्सुलिन विरोध तीव्र असतो किंवा ज्यांच्या स्वादुपिंडाच्या कार्यशक्तीवर अनुवंशिक मर्यादा असतात, अशांना मधुमेह जडतो. थोडक्‍यात लठ्ठ व्यक्तीत मधुमेहाचे प्रमाण सामान्य व्यक्तीपेक्षा जास्त असते; परंतु सर्वच लठ्ठ माणसे मधुमेही नसतात. त्याचप्रमाणे सर्वच मधुमेही लठ्ठ नसतात.
लठ्ठपणामुळे होणारा प्रकार 2 चा मधुमेह खालील तीन कारणांशी निगडीत आहे -
1) इन्सुलिन विरोध - चरबीचे विघटन हे तुलनेने कातडीखालील चरबीपेक्षा पोटातील चरबीमध्ये जास्त होते. विघटित झालेली चरबी पेशींवर होणाऱ्या इन्सुलिनच्या क्रियेत अडथळा निर्माण करते. त्यामुळे शरीराच्या मांसल भागास पोहोचणारी साखर इन्सुलिनच्या दुर्बलतेमुळे पोहोचू शकत नाही आणि या क्रियेला वैद्यकीय भाषेत इन्सुलिन विरोध असे संबोधतात.
2) पोटातील अतिरिक्त चरबी काही जैविक सक्रिय कण तयार करतात. उदा. ट्यूमर नेकोसिस फॅक्‍टर, ऍडिपोनेक्‍टीन, रेझिसटीन, लेफ्टीन हे सर्व सक्रिय कण इन्सुलिन विरोध अथवा इन्सुलिनची अल्पसंवेदनशीलता होण्यास कारणीभूत ठरतात.
3) पोटातील विघटित झालेली चरबी यकृतामध्ये जाऊन तेथे इन्सुलिनच्या पेशी समूहावर होणाऱ्या क्रियेत अडथळा निर्माण करतात. अशा प्रकारे इन्सुलिन विरोध निर्माण होतो. त्यामुळे साखर जास्त प्रमाणात रक्तात आढळून येते आणि प्रकार 2 चा मधुमेह होतो.
"जितका तुमचा पोटाचा घेर जास्त, तितका तुमचा मधुमेह होण्याचा धोका जास्त.'' (भारतीय पुरुषांमध्ये पोटाचा घेर 90 सेंटिमीटर व भारतीय स्त्रियांमध्ये पोटाचा घेर 80 सेंटिमीटरपेक्षा जास्त असू नये.)
लठ्ठ मधुमेही व्यक्तीचे वजन कमी केल्यास होणारे फायदे -
1) रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते व त्यामुळे मधुमेही व्यक्तीची औषधे कमी होऊ शकतात.
2) उच्च रक्तदाब आणि मधुमेह बरेचदा व्यक्तीस एकत्र असतात. वजन कमी केल्यास उच्च रक्तदाब कमी होण्यास खूप मदत होते. उच्च रक्तदाब आणि मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी तसेच एकत्र असल्यामुळे होणाऱ्या उपद्रवांपासून दूर राहण्यासाठी वजन कमी केल्यास खूप मदत होते.
3) रक्तातील चरबी, वजन कमी केल्यास कमी होते. रक्तातील चरबी वेगवेगळ्या प्रकारची असते. ढोबळ मानाने चरबीचे दोन प्रकार असतात. चांगली आणि वाईट. वजन कमी केल्यास चांगली चरबी वाढते आणि वाईट चरबी कमी होते. त्यामुळे लठ्ठ मधुमेही लोकांमधील हृदयरोग अथवा हृदयरोगाचा झटका येण्याचे प्रमाण कमी होते.
मधुमेहाचे उपचार सामान्य तत्त्वे-
मधुमेहाचे उपचार हे आहार योजना, व्यायाम, औषधोपचार आणि मधुमेहासंबंधी ज्ञानार्जन या चार आधारस्तंभावर आधारलेले आहेत.
मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी, तसेच मधुमेहामुळे होणाऱ्या उपद्रवांपासून दूर राहण्यासाठी संतुलित आहार, व्यायाम आणि योग्य औषधोपचार या उपचाराच्या तिन्ही अंगांचा एकत्रित उपयोग करून घेण्यासाठी रुग्ण ज्ञानी, तत्पर आणि परिपक्व असला पाहिजे.
आहार योजना -
मधुमेहाचे निदान झाल्यानंतर प्राथमिक व अंतिम उपाय म्हणून चहातील साखर बंद करणे अथवा कोणत्याही स्वरूपातील गोड सेवन बंद करणे ही एवढीच उपाययोजना केली जाते; पण मधुमेहाच्या उपचारामधील सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे "तेल व स्निग्ध पदार्थांचा योग्य आणि नियंत्रित वापर'' याकडे कितपत लक्ष पुरवले जाते? याचा विचार व्हायला हवा.
आहारातील सर्व घटकांचे योग्य प्रमाण हे संतुलित आहाराने साध्य होते. आहारात योग्य कॅलरी असाव्यात. त्यामुळे वजन नियमित राहील आणि शक्ती मिळेल. लठ्ठ माणसांनी दैनंदिन गरजेपेक्षा कमी कॅलरीचे सेवन करावे. पर्यायाने कातडीखालील अथवा पोटावरील चरबीचे विघटन होऊन कॅलरींची कमतरता आपोआप भरून काढली जाईल आणि अशा प्रकारे वजन पण कमी करता येईल. जास्त असलेले वजन कमी केल्यास पेशीसमूहाची संवेदनक्षमता वाढते. त्यामुळे रक्तातील साखर कमी होते. थोडक्‍यात लठ्ठपणा कमी केल्यास इन्सुलिनचा परिणाम पेशीसमूहावर जास्त होतो. ज्या मधुमेही व्यक्तींचे वजन प्रमाणबद्ध असते त्यांनी दैनंदिन आहारातील कॅलरीचे प्रमाण कमी करण्याची मुळीच गरज नाही.
प्रतिबंधक मधुमेह
आई-वडिलांपैकी एकाला मधुमेह असला तर त्यांच्या मुलांना पुढील आयुष्यात मधुमेह होण्याची शक्‍यता 25 टक्के असते. ही शक्‍यता मधुमेह दोघांना असल्यास 75 टक्‍क्‍यांपर्यंत वाढते. आई-वडिलांपैकी आईला मधुमेह असेल तर पुढील पिढीत तो उतरण्याची शक्‍यता थोडी जास्त असते. हे अंदाज प्रकार 2 च्या मधुमेहाच्या बाबतीत आहेत आणि ढोबळ आहेत.
मधुमेह होण्यापाठीमागे भोवतालची परिस्थिती आणि अनुवंशिकता दोघांचाही हात असतो. पहिले कारण जरी थोडे फार परिवर्तनीय असले तरी दुसरे नाही. एकाच आई-वडिलांची दोन मुले, दोन निरनिराळ्या परिस्थितीत वाढू शकतात. एकाचे वजन जास्त असले तर त्याला त्याच्या साधारण वजनाच्या भावापेक्षा मधुमेह होण्याची शक्‍यता जास्त म्हणून प्रतिबंधक उपाय हे जन्माला आल्यापासून करावे आणि लहानपणीच लठ्ठपणा टाळावा.
लठ्ठपणा हा आजार, मधुमेह या रोगाप्रमाणे आयुष्यभर सतावणारा रोग असून त्यासाठी या रोगाप्रमाणेच आयुष्यभर उपचार करावे लागतात तसेच हा आजार पूर्णपणे बरा न होता फक्त आटोक्‍यात आणता येतो. अर्थातच लठ्ठपणा (पोटाचा घेर कमी करणे) हा उपाय केल्यास, मधुमेह नियंत्रित ठेवता येतो.
-डॉ. किरण रुकडीकर

No comments: